विसापुर येथे भूमिगत कोळसा खाणी ला विरोध,वेकोलि खाणची मागणी

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : केंद्र सरकारने प्रस्तावित भिवकुंड कोल ब्लॉकभूमिगत कोळसा खाणीसाठी विसापूर व नांदगाव पोडे येथील ८०२ हेक्टर क्षेत्रात मे.सन्फ्लॅग आयर्न अँड स्टील लिमिटेडला मंजुरी दिली होती. या प्रस्तावित प्रकल्प स्थळावर बुधवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी घेतली.या सुनावणीत विसापूर व नांदगाव पोडे येथील शेतकऱ्यांनीखासगीऐवजी वेकोलिची खाण हवी, अशी भूमिका मांडली. यावेळी जनसुनावणीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, पर्यावरण अधिकारी तानाजी जाधव व सहाय्यक पर्यावरण अधिकारी ड.भ.भादुले नागरिकांच्या मुद्द्यांची नोंद घेतली.जनसुनावणीला राजकीय नेत्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. या सुनावणीत कंपनीचे प्रतिनिधी मुख्य सल्लागार माईन्स डॉ. गणेश मानेकर यांनी कंपनीच्या वतीने प्रदूषणासंदर्भातील मुद्द्यांवर उपाय योजना व आणि स्थानिक ९०० बेरोजगारांना रोजगार संदर्भात भूमिका मांडली. शेतकऱ्यांनी भूमिगत कोळसा खाण झाल्यास पाण्याची पातळी कमी होणे, जमिनीतील रासायनिक द्रव्य बाहेर आल्याने होणारे दुष्परिणाम व धुळीमुळे होणारी नापिकी याकडे लक्ष वेधले. यावेळी कंपनीच्या बाजुने मुद्यांचे निवारण केले जात होते. अनेक राजकीय पक्षांचे पुढारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या पक्षांची भूमिका मांडली. यावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून बल्लारपूरचे ठाणेदार पी आय आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्त होता. काही शाब्दिक वाद वगळता सुनावणी शांततेत पार पडली.सुनावणीला विसापूरचे सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, छ. शिवाजी महाराज समितीचे अध्यक्ष बंडू गिरडकर, प्रदीप गेडाम, भाजपच्या सरचिटणीस विद्या देवाळकर, नांदगाव येथील माजी जि.प. सदस्य मनोहर देऊळकर, काँग्रेसचे सुनील शेंडे उपस्थित होते.जनसुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. या उद्योगांच्या प्रदूषणामुळे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा रोष यावेळी दिसून आला.

CLICK TO SHARE