पत्नी ने घेतला पतिचा जीव,रागात पतिचा गळा आवळून केला पतिचा जीवन समाप्त

क्राइम

प्रतिनिधि : निखिल बावणे वर्धा

वर्धा : घरगुती कलहातून झालेल्या वादात पतीची गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. ७) मध्यरात्रीच्या सुमारास नागठाणा परिसरात घडली. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालावरून ८ रोजी हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपी पत्नीस अटक करून इतर तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.गणेश हरिभाऊ भलावी (४०, रा. नागठाणा) असे मृतकाचे नाव आहे, तर पोलिसांनी अटक केलेल्यांत सुनीता गणेश भलावी हिचा समावेश असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली. गणेश भलावी हा मजुरी काम करतो. दररोजप्रमाणे तो ७ रोजीही घरून सकाळी मजुरी कामासाठी निघाला. रात्री उशिरा घरी आला. त्याने पोटभर जेवणही केले. मात्र, मध्यरात्रीला गणेशचा पत्नी सुनीताशी घरगुती कारणातून वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. अखेर संतापलेल्या पत्नीने रागाच्या भारात पती गणेशचा हाताने गळा आवळून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी नागठाणा परिसर गाठून पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला. मात्र, ८ रोजी रात्री याप्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी पत्नी सुनिताने पती गणेशची हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा बनाव केला. त्याच्या गळ्यात दुपट्टा बांधून ठेवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता काही बाबी संशयास्पद वाटल्या. अखेर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपी पत्नीनेच हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने तिला बेड्या ठोकल्या.घटनेवेळी घरात केवळ पती अन् पत्नीच हजर असल्याने पोलिसांचा संशय बळावला. सुरवातीला पत्नीच्या बयाणावरून आकास्मिक मृत्यूची नोंद करत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. बुधवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मृतदेहाचा तात्पुरता शवविच्छेदन अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यां अहवाल देताच गणेशची गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांची दिशा स्पष्ट झाली आणि तत्काळ आरोपी पत्नीस ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

CLICK TO SHARE