तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव
आमगांव येतील बसस्थानक व परिसर ते आंबेकर चौक, तसेच कामठा चौक, गांधी चौक रोडवरील रस्त्यावर व्यापारी, व्यावसायिकांसह नागरिकांचेही वाहन रस्त्यावर पार्किंग केले जात असल्याने रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.त्यातून लहान-मोठे अपघात होत असतात. या परिसरातील बेशिस्त वाहतूक व पार्किंगचा कायमचाच बंदोबस्त होणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक पोलिस विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील रस्तेही आता तोकडे ठरू लागले आहेत. त्यातच बेशिस्त वाहतूक व बेशिस्त पार्किंग पद्धतीने तर शहरवासीयांची नाकेनऊ आली आहे.आमगांवतील हा परिसर म्हणजे शहरातील मुख्य रस्ता मानला जातो.या परिसरात बसस्थानक, कामठा चौक, मुख्य बाजारपेठ, बँका, विविध प्रकारचे व्यापारी व्यावसायिकांचे दुकाने, हॉटेल्स आदी आहेत. शहरातील प्रतिष्ठित दवाखाने, शाळा-महाविद्यालयांकडे जाण्यासाठीही हाच मुख्य मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. कधी कधी या रस्त्यावरील दोन मिनिटाचे अंतरही पार करणे जिकिरीचे ठरते.बेशिस्तीने वाहनांची पार्किंग करणे, मनाला पटेल तशा दुचाकी उभी करणे, रस्त्यावरच कार पार्किंग करणे या कारणांनी येथे वाहतुकीची कोंडी होते. तसे पाहिल्यास ही कोंडी सुटू शकते. मात्र त्यासाठी या परिसरातील प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक व या परिसरात वाहने लावणाऱ्या प्रत्येकाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. व्यापारी दुकाने आहेत मात्र पार्किंग नाही. तसेच बाजारात जाणार रस्ता तर दोन्ही बाजूला भाजी व इतर साहित्य विक्रेते आपले दुकाने थाटून बसतात. तेथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यांचे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. तीच परिस्थिती बसस्थानक ते आंबेकर चौक व गांधी चौक व बसस्थानक या भागात वाहने रस्त्यावर लावलेली असतात. त्यामुळे या भागात जाण्या-येण्यासाटीही तारेवरची कसरत करावी लागते. या भागात दुचाकीचा विळखा या रस्त्यावर कायमचीच डोकेदुखी ठरली आहे. बेशिस्त वाहतुकीला व बेशिस्त वाहन लावणाऱ्यांना पोलिसांनी वाहतुकीचा नियमांचा झटका दाखविणे आवश्यक आहे.*रस्ता ओलांडणे ठरतेय जिकरीचे* आमगांव येथील मुख्य मार्गावर सध्या मनमर्जीने वाहने उभी केली जात आहेत. त्याकडे पुलिस विभाग चे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणार ठरत आहे. मनमर्जीने वाहने उभी करणाऱ्या बेशिस्तांना शिस्त लावणार कोण, असा प्रश्न सध्या सुजान नागरिकांकडून विचारला जात आहे.