बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पाणीटंचाईवरील उपाययोजना आणि रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : पाणीटंचाई आणि रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत.आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुल तालुक्यातील बोरचांदली व पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे आदी गावांतील पाणीटंचाई विषयी आलेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करावी. पाणी टंचाईच्या काळात पोंभुर्णा तालुक्यात मोठ्या विहिरीचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन आमदार निधीतून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.मुल तालुक्यातील उमा नदीतील पाण्याच्या अभावामुळे भेजगाव व चिचाळा गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना कराव्यात. पाणी पिण्यास अयोग्य असल्यास त्या ठिकाणी दवंडी देणे, सूचना फलक लावणे, पाण्याची तपासणी करणे व बोरींगला लाल रंग देणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मतदारसंघातील चार तालूक्यातील खाण परिसरात पाण्याचा सर्वे करून मागील १० वर्षांचा जलस्तर तुलनात्मक तक्त्यात मांडावा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरो मशीन बसवण्यात आल्या असून, त्या बंद राहू नयेत यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश संबधित तहसीलदार व बीडीओंना देण्यात आले. सदर आरओ मशीन पूर्ववत सुरू करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असेही ते म्हणाले.महावितरण विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांना अद्याप विद्युत कनेक्शन दिले नसल्याचे निदर्शनास आले. तात्काळ विद्युत कनेक्शन तातडीने देण्याचे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिले. त्यासोबतच, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चार तालुक्यांतील ज्या गावांना महावितरणने अद्याप विद्युत कनेक्शन दिलेले नाही अशा गावांची यादी तयार करावी. जिल्ह्यात पाणी तपासणीच्या ६ प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत.या आढावा बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपविभागीय अधिकारी संजय पवार (चंद्रपूर), रवींद्र माने (राजूरा), अजय चरडे (मुल), चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, मुल तहसीलदार मृदुला मोरे, बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे, पोंभूर्णा तहसीलदार रेखा वाणी, मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मुलचे मुख्याधिकारी संदीप दोडे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते,मतदारसंघातील सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी आदिंची उपस्थिती होती.