HT News India च्या पत्रकारितेमुळे वणा नदीतील अवैध रेती उपसाचे प्रकरण उघड पियुष इन्फ्रा कंपनीवर लाखोंचा दंड

अब्दुल कदीर बख्श
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील डंकीन परिसरात वणा नदीच्या पात्रातून औरंगाबाद येथील पियुष इन्फ्रा कंपनीने बंधाऱ्याच्या कामाच्या नावाखाली प्रशासकीय परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सर्वप्रथम HT NEWS INDIA ने या गैरप्रकाराचा पर्दाफाश करत बातमी प्रकाशित केली, ज्यामुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली.या बातमीची दखल घेत वणा नदी संवर्धन समितीनेही पुढाकार घेतला. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन अवैध रेती साठ्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून प्रशासनाच्या निदर्शनास आणले.महसूल विभागाच्या चौकशी दरम्यान नायब तहसीलदार सागर कांबळे आणि तलाठी सय्यद अहमद शेख यांनी सदर ठिकाणी सुमारे १०० ब्रास रेती असल्याचे नमूद केले होते.त्यानंतर प्रशासनाला विविध निवेदने देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तहसीलदार योगेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रेती मोजणीचे आदेश दिले. सदर मोजणीत ६३.१० ब्रास रेती असल्याचे निष्पन्न झाले. हा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आणि त्यांच्या आदेशानुसार पियुष इन्फ्रा कंपनीवर १४,५७,६१० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.ही कारवाई झाल्यामुळे हे स्पष्ट झाले की कंपनीने बेकायदेशीररीत्या रेती उपसली आहे. मात्र, वणा नदी संवर्धन समितीने या दंडाच्या रकमेवर तीव्र असमाधान व्यक्त करत ही रक्कम किमान चौपट करावी, अशी मागणी केली. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात रेती उपसण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर झाला होता आणि तरीही खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शिवाय, या प्रकरणात वापरलेली वाहतूक व मशिनरी जप्त करण्यात आलेली नाही.विशेष बाब म्हणजे महसूल विभागाच्या पाहणीत १०० ब्रास रेती असल्याचे सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात केवळ ६३.१० ब्रास रेती मोजली गेली, मग उर्वरित ३७ ब्रास रेतीचे काय झाले? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.याचवेळी, बंधाऱ्याच्या खोदकामादरम्यान मानवी अवशेष आढळून आले होते. या अवशेषांची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या आरोपावरून पियुष इन्फ्रा कंपनी व पाटबंधारे विभागावर कोणतीही कठोर कारवाई झाली नसल्याने समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत पोलिस प्रशासनाने तातडीने कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.प्रशासनाच्या संथ कारवाई आणि गंभीर प्रकरणावर योग्य ती दखल न घेतल्यामुळे वणा नदी संवर्धन समितीने न्यायालयात याबाबत दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पर्यावरण व सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपयोजना न केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी पुढे जावून कडक कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.HT NEWS INDIA च्या प्रामाणिक पत्रकारितेमुळे हा गैरप्रकार उघडकीस आला आणि त्यामुळे प्रशासनाला कारवाईस भाग पाडावे लागले. वणा नदी संवर्धन समितीने पर्यावरण आणि जनहितासाठी सुरू ठेवलेला लढा तसेच HT NEWS INDIA ची जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे.