अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई व विकासकामांसाठी निधी देण्याबाबत आमदार रामदास मसराम यांची सहपालकमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी– गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब यांची आज नागपूर येथील निवासस्थानी आमदार रामदासजी मसराम यांनी भेट घेऊन आरमोरी विधानसभा मतदारसंघातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.दिनांक २१ मे ते २४ मे २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी आमदार मसराम यांनी केली. यासोबतच मतदारसंघातील विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही विनंती त्यांनी केली.या मागण्यांची तत्काळ दखल घेत सहपालकमंत्री जयस्वाल यांनी जिल्हा नियोजन अधिकारी पाचखेडे यांना तातडीने निर्देश दिले. तसेच,आमदार मसराम यांना आश्वस्त केले की, आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.या प्रसंगी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष जीवन पाटील नाट,कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,माजी उपसभापती नितीनजी राऊत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड व कमलेश बारस्कर यांचीही उपस्थिती होती.या भेटीमुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आणि विविध विकासकामांसाठी आवश्यक पाठबळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.