वसमत शहरात रखडलेल्या विकास कामांची तात्काळ माहिती द्या:-उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत शहरातील अनेक विकास कामे अपूर्ण अवस्थेत बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद वसमतचे उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वसमत कार्यालयास पत्र देवून करून रडखडलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे,लक्की हॉटेल वसमत ते मयूर मंगल कार्यालय परिसरापर्यंत सुरू असलेले दुभाजक, रोड व नाली बांधकामाचे काम अपूर्ण अवस्थेत बंद पडले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आसेगाव कॉर्नर ते शासकीय फेडरेशन कौठा रोड, वसमत या मार्गावरील दुभाजक व रस्त्याचे कामही अपूर्ण अवस्थेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या दोन्ही कामांबाबत अंदाजपत्रक, अंतिम मुदत, आजपर्यंत पूर्ण झालेले व बाकी असलेले काम, नाली व स्लॅब बांधकामाची माहिती, बॉक्स सेलचे इस्टिमेट, मूळ संख्येची माहिती, दुभाजकातील इलेक्ट्रिक पोल, झाडे, कटआउट, रबर प्लास्टिक पेंट, साईड बोर्ड तसेच रोडच्या दोन्ही बाजूंना करण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉक व स्पीड ब्रेकरची संपूर्ण माहिती देण्याची मागणी निवेदन पत्रातून करण्यात आली आहे.
शहरातील रखडलेली विकास कामे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पूर्ण करून शहराच्या सुशोभीकरणात भर पडावी, तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही माहिती मागविण्यात आल्याचे सय्यद इमरान अली यांनी स्पष्ट केले आहे.
जर संबंधित कामांची मुदत संपलेली असेल तर ती पुन्हा सुरू करून पूर्ण करण्यात यावीत,अशीही मागणी त्यांनी पत्राद्वारे प्रशासनाकडे केली आहे.