पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा

Tue 09-Dec-2025,07:45 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

नागरी समस्या संघर्ष समितीची कारंजा नगरपंचायत कडे मागणी

वर्धा:कारंजा ( घाडगे) कारंजा शहरातील नगरपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेचे काम कार्यारंभ आदेशाच्या तारखेपासून १८ महिन्याच्या निर्धारित कालखंडात कंत्राटदाराला पूर्ण करावयाचे बंधनकारक असून सुद्धा योजनेच्या कामाला २४ महिने लोटले तरी अजून पर्यंत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास न गेल्यामुळे 

नगरपंचायतने ताबडतोब योजनेचे काम पूर्ण करून घ्यावे आणि नागरिकांना नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे पाण्याचे वितरण करावे अशी मागणी स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने नगरपंचायत चे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे केली आहे. 

खैरी धरणामध्ये बाराही महिने आरक्षित पाणी उपलब्ध असून नागरिकांना मात्र गेल्या कित्येक वर्षापासून कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात पाणी समस्येने गंभीर स्वरूप धारण आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेद्वारा नागरिकांना पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे.      

या समस्येतून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा म्हणून कारंजा शहराकरिता (अमृत २.० ) ही पाणीपुरवठा योजना ८ मे २०२३ रोजी शासनाकडून मंजूर झाली . या योजनेची कार्यान्वय यंत्रणा कारंजा नगरपंचायत आहे.

२२ नोव्हेंबर २०२३ रोजी मंजूर योजनेच्या कामाचा नगरपंचायत कडून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश मंजूर झाला. कार्यारंभ आदेशापासून पुढील १८ महिन्यात योजनेचे काम पूर्ण करणे कंत्राटदारास बंधनकारक असून सुद्धा आज रोजी २४ महिन्याचा कालावधी झाला तरी पण अजून पर्यंत नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. आणि नागरिकांना नवीन योजनेद्वारे पाणीपुरवठा अजून पर्यंत सुरू झालेला नाही.

शहरातील पाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन कंत्राटदाराकडून लवकरात लवकर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून घ्यावे. आणि नागरिकांना दररोज नियमित शुद्ध पाणीपुरवठा करावा. व कृत्रिमपणे भेडसावणाऱ्या पाणी समस्येतून ताबडतोब दिलासा द्यावा अशी मागणी कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीने निवेदनातून नगरपंचायत कडे केली आहे.

निवेदन देतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.