घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींनी प्रशासनास सहकार्य करावे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि युसुफ पठाण
वर्धा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा आढावा
वर्धा:वर्धा शहरालगतच्या वळण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून प्रदूषणातही लक्षणीय वाढ होत आहे. ही समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीस शहरालगतच्या ग्रामपंचायतींनी पूर्ण सहकार्य करावे. तसेच घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात अडचणी व तक्रारी असल्यास त्या समितीसमोर सादर कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वर्धा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी.मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, तहसीलदार संदीप पुंडेकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.
नालवाडी, बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे), पिपरी (मेघे), सेवाग्राम, आलोडी, उमरी (मेघे), म्हसाळा, सावंगी (मेघे), वरुड व पवनार या ११ गावांतील घनकचरा व्यवस्थापनासाठी समितीमार्फत कचरा संकलनासाठी तीन झोन तयार करण्यात येणार आहेत. गावांमधून संकलित करण्यात आलेला घनकचरा झोननिहाय डम्पिंग यार्डमध्ये जमा केला जाणार असून त्यामुळे ग्रामपंचायतींवरील आर्थिक भार कमी होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतीमार्फत गोळा करण्यात आलेला घनकचरा झोनपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वार्डात दररोज कचरा संकलन वाहन गेले पाहिजे, याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच मंगल कार्यालये व हॉटेल्स यांनी उघड्यावर कचरा टाकू नये. नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या की, घनकचऱ्यामध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये प्लास्टिक वापराविषयी जनजागृती करावी. तसेच प्लास्टिक वापरणाऱ्या ग्राहकांबरोबरच विक्रेत्यांवरही कठोर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.