भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोघा युवकांचा जागीच मृत्यू, अल्लीपूर गावावर शोककळा

Tue 17-Jun-2025,03:44 AM IST -07:00
Beach Activities

 प्रतिनिधी – सुनिल हिंगे, अल्लीपूर

देवळी तालुक्यातील शिरपूर येथून काम आटोपून दुचाकीवरून परतत असलेल्या दोन युवकांना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. नागपूर–यवतमाळ महामार्गावरील रत्नापूर चौकात सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

अपघातात मृत्युमुखी पडलेले युवक प्रफुल्ल किटे (वय ३८) आणि समीर रेंढे (वय २१) हे दोघेही अल्लीपूर येथील रहिवासी होते. शिरपूर येथे कामानिमित्त गेलेले हे दोघे MH 32 AB 6416 क्रमांकाच्या दुचाकीवरून परतत असताना भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही काही अंतरावर फेकले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेने अल्लीपूर गावावर शोककळा पसरली असून, दोघांचेही कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

"प्रफुल आणि समीर यांच्या आठवणी गावाच्या काळजात कोरल्या गेल्या आहेत - आणि यांच्या अकाली मृत्यु संपूर्ण समाजासाठी एक मोठी शोकांतिका ठरली आहे."