दारूविक्रेते तडीपार, पण धंदा तेजीतच! अल्लीपूर पोलिसांची कारवाई तोकडी, अवैध दारूविक्रीला उधाण

Tue 24-Jun-2025,01:52 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी: सुनिल हिंगे, अल्लीपूर

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूविक्री सर्रास सुरू असून, अल्लीपूर परिसरात हे संकट अधिकच गंभीर झाले आहे. पोलिसांनी काही नामांकित दारूविक्रेत्यांना तडीपार केले असले, तरी गावागावांत नव्याने दारूविक्रेते उभे राहत असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

कानगाव येथील जितेंद्र लढी आणि शुभम वाघमारे या दोघांना अलीकडेच पोलिसांनी तडीपार केलं. या कारवाईमुळे दारूविक्री कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात नव्या टोळ्या उभ्या राहत असून, त्यांचा उद्दामपणा पोलिसांसमोर आव्हान बनला आहे.

कचऱ्याच्या शेडखाली 'दारूचे साम्राज्य'

कानगावमध्ये शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन शेडचा वापर कचऱ्यासाठी न होता, दारूविक्रीच्या अड्ड्यासाठी केला जात आहे. याठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरू असून, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने डोळेझाक केली आहे.

कमी कर्मचारी, अर्धवट कारवाई

अल्लीपूर पोलीस स्टेशनअंतर्गत एकूण ४० गावे असून, त्यात अल्लीपूर, कानगाव आणि तळेगाव अशी तीन बीट्स आहेत. मात्र पोलिसांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे कारवाई अपुरीच राहते. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात openly देशी व विदेशी दारूचा व्यवसाय चालतो, हे गृहमंत्रालय आणि पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ठाऊक आहे, तरीही कारवाईस फक्त कागदोपत्री मर्यादा आहे.

कानगाव – 'दारूविक्रीचे केंद्रबिंदू'

कानगावमध्ये अमरावती जिल्ह्यातून बनावट दारू आणून चढ्या दराने विकली जाते. रामतीर्थ (जि. यवतमाळ) या शेजारच्या गावातून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर दारू कानगावमध्ये पोहोचते आणि तेथून ती आसपासच्या चाणकी, गाडेगाव, नांदगाव, रोहणखेडा, कोसुर्ला गावांमध्ये वितरित केली जाते.

नवीन ठाणेदारांची ठाम भूमिका

अल्लीपूर पोलीस स्टेशनचे नुकतेच पदभार स्वीकारलेले ठाणेदार विजय घुले यांनी काही दारूविक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. तसेच, अशा धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.