बरबडी गावात शेतातील साहित्य जाळून दीड लाखांचे नुकसान
बरबडी गावात शेतातील साहित्य जाळून दीड लाखांचे नुकसान
वर्धा शहर प्रतिनिधी : अमन नारायणे
वर्धा : वर्धा तालुक्यातील बरबडी गावात अज्ञात व्यक्तींनी शेतातील शेती उपयोगी साहित्य तसेच साठवून ठेवलेला गहू जाळून टाकल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज मोतीरामजी सोनटक्के (रा. बरबडी, ता. वर्धा) यांच्या शेतात दि. २६ मे २०२६ रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अज्ञातांनी शेतातील फवारणी पंप, पाईप, रासायनिक खताची पोती, विषारी औषधांचे डबे, गुरांचा चारा तसेच साठवून ठेवलेला गहू जाळून टाकला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालय, वर्धा येथील तहसीलदार संदीप पुंडेकर यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी विजय झाडे व पटवारी निकेश परचाके यांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी अहवाल तहसीलदारांकडे सादर केला आहे.