छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३४५ व्या वर्धापनदिनानिमित्त वर्धा येथे भव्य पालखी सोहळा

Sat 17-Jan-2026,11:56 PM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा | वर्धा दिनांक : १६ जानेवारी २०२६ छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पावन निमित्ताने आज वर्धा शहरात भव्य व ऐतिहासिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या शौर्यशाली मराठा परंपरेचे जतन करत हा सोहळा अत्यंत उत्साह, भक्तीभाव व अभिमानाच्या वातावरणात पार पडला.

पालखी सोहळ्याची सुरुवात वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक येथून करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी पारंपरिक पद्धतीने आकर्षकरीत्या सजविण्यात आली होती. “छत्रपती संभाजी महाराज की जय” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

हा ऐतिहासिक पालखी सोहळा वर्धा क्रांती मोहीमचे संस्थापक श्री. समर्थ कुकडे तसेच वर्धा विभाग मोहीमच्या सदस्या कु. सृष्टी सोनुले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण, शिवप्रेमी, महिला तसेच विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वर्धा शहरातील अनेक सामाजिक संस्थांनीही या पालखी सोहळ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सहभाग घेतला.

या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग, धर्मनिष्ठा तसेच स्वराज्यासाठी दिलेले अतुलनीय बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. हा सोहळा केवळ धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम न राहता इतिहासाची जिवंत अनुभूती देणारा ठरला.

याप्रसंगी आयोजकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचे तसेच समाजात राष्ट्रप्रेम, इतिहासाभिमान व सांस्कृतिक एकात्मता वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्व शिवप्रेमी, कार्यकर्ते व नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.